गझल

गझल

काय देईल गारवा रस्ता

काय देईल गारवा रस्ता
जर उन्हाचा तुला हवा रस्ता

एक वस्ती पुकारते दुर्गम
एक इकडून पाठवा रस्ता

आज ती गोठवून गेली की
मंद आचेत वाफवा रस्ता

पोचतो जन्म त्याच मुक्कामी
घेत प्रत्येकदा नवा रस्ता

आज कोणी न आडवे आले
आज येईल आडवा रस्ता

एकमेकांमधे नका मिसळू
फक्त रस्त्यात कालवा रस्ता

सांजवेळी हयात छेडावी
गात राहील मारवा रस्ता

कोण आले असेल रस्त्यावर
फार करतोय वाहवा रस्ता

सोडले जर विचार तिमिराचे
खुद्द होईल काजवा रस्ता

ध्येय ठरवू नका स्वतःचे पण
फक्त रस्त्यास दाखवा रस्ता

गझल: 

मन आता हे कळल्यावरती उदास नाही..

मन आता हे कळल्यावरती उदास नाही..
रस्ता संपत आला आहे, प्रवास नाही!

फूल उमलले आहे..कुठले मनात त्याच्या
रंग जराही नाही...त्याला... सुवास नाही!

स्थान किती छोटेसे त्याला नभात आहे...
कळले सूर्यालाही आता..... मिजास नाही!

त्यांनी घोषित केले की तो पळून गेला!
केला ज्यांनी थोडा सुद्धा तपास नाही

शहर तुझे हे बघता बघता कळून आले
बदल जरासा झाला आहे, विकास नाही

.....जयदीप

गझल: 

हासल्यासारखी भासती माणसे

गझल - हासल्यासारखी भासती माणसे

हासल्यासारखी भासती माणसे
त्रासल्यासारखी हासती माणसे

फक्त ज्यांना मने मोडणे साधते
जोडली मी सदा खास ती माणसे

जो स्वतः खडबडी वाट चोखाळतो
तो म्हणे मत्सरी ग्रासती माणसे

गाढ आलिंगने द्यायची नाटके
दु:ख दु:खावरी घासती माणसे

फक्त एका क्षणाच्या भयाने इथे
शंभरी आपली नासती माणसे

त्याच रंगात ती जन्मली जाण तू
रंग जो जो तुला फासती माणसे

रोज येतो दिवस तेच ते घेउनी
पण तरी रोज आ वासती माणसे

'बेफिकिर' भासती ती तुझ्यावाचुनी
जी तुला पाहुनी त्रासती माणसे

गझल: 

गझल : ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे

ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे
ते तुझे अपसव्य कुठली सव्यता राखून आहे

येथले अस्तित्त्व जपणे हे खरे खोटारडेपण
बन अशी आख्यायिका जी सत्यता राखून आहे

तोडले केव्हाच आपण आपले नाते तरीही
का अशी , ते एक हल्की तन्यता राखून आहे

जीवघेण्या वेदनांवर हासणारी सांत्वने ही
पण तरी कळीज माझे सभ्यता राखून आहे

दाद द्यावी ह्या, मनाच्या एवढ्याश्या ओसरीला
एवढ्या दाटीतही जी , भव्यता राखून आहे

विठ्ठला तू ऐकशिल ना तर तुझ्या झरतील आर्ता**
आजही मन त्या गझलची शक्यता राखून आहे

-वैवकु

गझल: 

गझल : माझ्या लक्षातच नाही

हा माल सुखाचा माझा का विकला जातच नाही
काय आज ह्या बाजारी कोणी दुःखातच नाही

नशिबाला पालटण्याचे केवढे यत्न केले पण
होणार कसे सांगा जर त्याच्या नशिबातच नाही

मी इथे जन्म घेण्याला झालीत कितीतर वर्षे
हे दुःख साजरे करणे माझ्या लक्षातच नाही

का नको त्यातिथे टाके घालत आहे हा शिंपी
आंधळाच आहे हा की काही पाहातच नाही

गावातिल सगळ्या शाळा आहेत मुलींच्या शाळा
हे पाहुन माझा मुलगा शाळेला जातच नाही

नेणिवबिंदूंतुन काही त्रिज्या खेचूया म्हटले
पण ह्या अमोघ परिघाला बहुधा संपातच नाही

-वैवकु

गझल: 

संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे

गझल - संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे

संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे
पुढे लागणे बांधायाला अनेक धरणे

मागे पडलेल्यांनी ज्यास निवडले नेता
त्यास जमेना आता मागे वळून बघणे

आठवणींचा मळ हृदयावर साचत आहे
मेल्याशिवाय शक्यच नाही कुठे मिरवणे

स्वतःतुनी जर वजा न केले कधी स्वतःला
तर मग कुठले जमायला हे शून्य समजणे

नवी पिढी एवढी आंधळी कशी निपजली
अंधांना चष्मे विकणारा डोळस ठरणे

साथ सोडणार्‍यांना टुकटुक करत म्हणालो
आम्हाला तर अजून जमते वाट पाहणे

म्हणून मागे बघत नसावेत लोक काही
जमत नसावे पुढे जायला पाय उचलणे

गझल: 

मधेच वाहते मधेच थांबते

मधेच वाहते मधेच थांबते
हवा कुठे मनानुसार वागते?

चढून चार पावलात पोचलो
शिखर तुझे दुरून उंच वाटते

असेच रोज येत जात राहुया
नको म्हणूस पायवाट लोपते

उशीर व्हायचा असेल जर तुला
फलाट सोडताच ट्रेन थांबते

हवे असेल तेवढेच घ्यायचे
असे करून पान स्वच्छ राहते!

जयदीप

गझल: 

स्त्री समीप येते ...

स्त्री समीप येते प्रेम वाटल्यावरती
पण तुमची होते सत्य बोलल्यावरती

जे कळले नव्हते का जपायची होती
ते कळले आता लाज सोडल्यावरती

जे अपुले नाही त्यात तू नको गुंतू
मन होते बघ परकेच गुंतल्यावरती

ज्यांना जे मिळते आणखी मिळो त्यांना
आपल्यास मिळणे फक्त आपल्यावरती

जे दिसत नसे त्यालाच फक्त पूजावे
जे दिसते, येतो हक्क पूजल्यावरती

डोळ्यांनाही इतकी तहान लागावी
की पितात अश्रूंनाच साठल्यावरती

नाती अनेक आहेत सांगण्याइतकी
एकटा तरीही भाव दाटल्यावरती

भळभळा मनाची जखम वाहते आहे
थांबवू कशी मी प्रेम टोचल्यावरती

गझल: 

Pages