मन आता हे कळल्यावरती उदास नाही..

मन आता हे कळल्यावरती उदास नाही..
रस्ता संपत आला आहे, प्रवास नाही!

फूल उमलले आहे..कुठले मनात त्याच्या
रंग जराही नाही...त्याला... सुवास नाही!

स्थान किती छोटेसे त्याला नभात आहे...
कळले सूर्यालाही आता..... मिजास नाही!

त्यांनी घोषित केले की तो पळून गेला!
केला ज्यांनी थोडा सुद्धा तपास नाही

शहर तुझे हे बघता बघता कळून आले
बदल जरासा झाला आहे, विकास नाही

.....जयदीप

गझल: