गझल

गझल

अखाडा



जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा

गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा

दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा

सूर्य क्रांतीचा उगवला
खोल रे आता कवाडा !

काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा

हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा

गझल: 

राहिलो एकेकटे दोघे जगत....!

.......................................................
राहिलो एकेकटे दोघे जगत....!
.......................................................


हुरहुरत तूही नि मीही तगमगत...!
राहिलो एकेकटे दोघे जगत...!


जागवत बसलो स्वतःला व्यर्थ मी
मीच माझे ऐकले नाही स्वगत...!


गंध उडतो; रंगही पडतो फिका...
शेवटी सार्‍या फुलांची हीच गत...!!


आणखी, माझ्या जवळ ये, आणखी...
तू जरी आहेस ह्रदयाच्या लगत...!


कोळसा समजून ज्याला फेकले
दूर तेथे राहिला तो झगझगत...!

गझल: 

बेसुरी सुरुवात...

बेसुरी सुरुवात झाली जीवनाची
फक्त आलापीच आहे.. वेदनांची


भैरवी आधीच... मैफल संपवावी
ही प्रथा नाहीच कुठल्या गायनाची


ताल हा... धरलाच आहे तू चुकीचा
सम तरी सांभाळ आता... वादनाची


सूर हे जुळतील आता सांग कुठुनी ?
तार ही तुटली तुझ्या-माझ्या मनाची


वेदनेचा... षडज-पंचम लागला हा
अन सुरावट छान जमली प्राक्तनाची


बासरी जमवायची ती... गोपगोपी
वाढली वर्दळ कशाने ? यातनांची

गझल: 

कसे मानू तुला माझा...

कसे मानू तुला माझा जरासा भासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही


कशाला जीर्ण स्वप्नांचे मनोरे मी उभारावे
अशासाठी जवळ केले तुझे ते भासही नाही


कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही


कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा तुझा सहवासही नाही


उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही

गझल: 

कधी...

कधी...


कुणी आमिषे दाखवली तर कुणी पाडली भूल कधी !
कुणी सारखे नागवले मज...  दिली शेवटी हूल कधी !


कधी गाव हे आवडले तर कधी भावली ती वसती...
इथे टाकले अंग कधी तर तिथे मांडली चूल कधी  !


तुझी ही अशी मान हले; मग तसा त्यावरी जीव झुले...
कधी मोरणी `होय` म्हणे तर `नको` सांगतो डूल कधी !


किती घासल्या रोज मनावर तुझ्या सारख्या आठवणी....
कुठे पेटला सांग तरी पण जिण्याचा पुन्हा गूल कधी ?


मनासारखी सोबत-संगत मिळे नेहमी काय कुणा ?
कधी लाभते फूल सुवासिक,  सले अंतरी शूल कधी !

गझल: 

...का दिसेनात आता कुठे ?

...का दिसेनात आता कुठे ?


ओळखीचे जुने चेहरे का दिसेनात आता कुठे ?
आपल्या माणसांची घरे का दिसेनात आता कुठे ?


सांग, झाली कधीपासुनी ही सुखासीन कांती तुझी ?
सांग ना... बोचकारे, चरे का दिसेनात आता कुठे ?


भेटलो, बोललो, हासलो  काल मी ज्या सुखांच्या सवे...
...काय झाले असावे बरे ? का दिसेनात आता कुठे ?


मीच झालो कशाला इथे एकटा कावरा-बावरा ?
सोबती कावरे-बावरे का दिसेनात आता कुठे ?

गझल: 

स्थित्यंतरे

कापली नाहीत अजुनी तेवढी मी अंतरे
योजिली आहेत माझी मी निराळी अंबरे


मी भरारी घेतली अन दशदिशा भारावल्या
वेधले मी या नभाचे कोपरे अन कोपरे


पडझडीचा काळ माझा संपता कळले मला
सारखी येणार आता ही अशी स्थित्यंतरे


मी मनाच्या ताकदीने पंख हे फैलावले
अन क्षणातच मुक्त झाले हे युगांचे पिंजरे


जे जसे वाट्यास आले ते तसे स्वीकारले
शोधले नाही कधीही मी सुखाचे आसरे

गझल: 

Pages