ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली

ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली
सावलीने साथ नाही सोडली

स्वप्न माझे जागलेले रात्रभर
अन् पहाटे झोप येऊ लागली

लोपल्या पाऊलवाटा शेवटी
का तुझी माझ्यात वर्दळ थांबली

लागुदे जर ऊन आहे लागते
सावलीमध्ये हरवते सावली

रोज आकाशात तारा जन्मतो
काजव्याने कात असते टाकली

जयदीप

गझल: 

शेवट लिहलेला असतो सुरुवातीवरती

का विश्वासच उरला नाही छातीवरती
सवलत मागत उठतो जो तो जातीवरती

इंद्रधनूचे रंग तुझ्या जर हातामध्ये
कशी दिसेना हिरवी नक्षी मातीवरती

अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती

चला जरा ही सुंदरतेची व्याख्या बदलू
ठरवायाचे कुठवर नुसत्या कातीवरती

इथेच सारे दिले-घेतले वसूल कर तू
मला नको आहेत येथली नाती वरती

आयुष्याची गोष्ट कळाया अवघड नसते
शेवट लिहलेला असतो सुरुवातीवरती
_________________________ शाम

गझल: 

तुझ्यासारखे वाचता येत नाही

तुझ्यासारखे वाचता येत नाही
मला माणसा परखता येत नाही

तुझ्यासारखी सहजता येत नाही
मला नेमके बोलता येत नाही

नको आज आणूस डोळ्यात पाणी
मला आजही पोहता येत नाही

तुझा राहुदे हात हातात माझ्या
मला एकटे चालता येत नाही

जरी लागतो रोज जयदीप माझा
तुझ्यासारखे तेवता येत नाही

----- जयदीप

गझल: 

तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

हवा आनंदली थोडी विखारी गारवे गेले
तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

जसे सांगीतले मी वाट गझलेची निवडल्याचे
तसे वाटेतुनी माझ्या सुखांचे हायवे गेले

तुझा अंधार झाल्याचे मला कळले कसे नाही
किती चमकून अत्ता आठवांचे काजवे गेले

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

जगाने फार शंकावून माझी तोलली भक्ती
जगाचे पार कामातून सारे ताजवे गेले

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

गझल: 

आजच्या आज

स्नेह निर्व्याज पाहिजे होता
आजच्या आज पाहिजे होता

ही अदाही बरीच आहे पण
वेगळा बाज पाहिजे होता

तान आहे तशी तयारीची
स्वच्छ आवाज पाहिजे होता

कसनुसे का हसून गेला तो
स्पष्ट नाराज पाहिजे होता

बडवतो काळ दोन बाजूंनी
जन्म पखवाज पाहिजे होता
---------------
विजय दिनकर पाटील

गझल: 

जे जगतो ते लिहिणारा

परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे

दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे

दृश्य जवळचे डोळ्यांच्या कक्षेत मावते कोठे
जरा दूर जा त्रयस्थ हो मग म्हण आकर्षक आहे

नसेल त्याच्याकडून झाले निराकरण दु:खाचे
धीर दिलेला सावरताना निश्चित पूरक आहे

तुझ्या मालकीच्या वस्तूंच्या गच्च कपाटामध्ये
दिलास कप्पा तूर्त एक हेही आश्वासक आहे
-----------------------
विजय दिनकर पाटील

गझल: 

गझल

थांबते जराशी ट्रेन पुन्हा धडधडते
हे उदास खेडे वाट कुणाची बघते

तापला सभोती रानमाळ वैशाखी
वार्‍यावर उगाच फूल तुझे लवलवते

कौलारू रंग मनावर चढतो इतका
कोसळते बरेच, किंचित मागे उरते

हे प्रेम म्हणू की निव्वळ खेळ मनाचा
ही नदी खळाळुन येते मग ओसरते

मी नवेपणाचे सोंग घेउनी निघतो
पोचतो जिथे वहिवाट जुनी सापडते

अनंत ढवळे

गझल: 

पाहिजे तेव्हा कुणीही...

पाहिजे तेव्हा कुणीही भेटले नाही
वागणे हे जीवनाचे चांगले नाही

शेवटी हा एक साक्षात्कार झाला की,
पाहिजे तेव्हा कुणीही भेटले नाही

फायदा काही न पांगापांग झाल्यावर
लोक असताना कुणीही बोलले नाही

फक्त हसणे हे तुझे आता पुरे झाले
यामधे माझे, तुझे काही भले नाही

जाणतो मौनातले मी खेळ सगळ्यांचे
जाणतो मी, हे कुणीही जाणले नाही

गझल: 

Pages