कसे मानू तुला माझा...

कसे मानू तुला माझा जरासा भासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही


कशाला जीर्ण स्वप्नांचे मनोरे मी उभारावे
अशासाठी जवळ केले तुझे ते भासही नाही


कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही


कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा तुझा सहवासही नाही


उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही

गझल: 

कधी...

कधी...


कुणी आमिषे दाखवली तर कुणी पाडली भूल कधी !
कुणी सारखे नागवले मज...  दिली शेवटी हूल कधी !


कधी गाव हे आवडले तर कधी भावली ती वसती...
इथे टाकले अंग कधी तर तिथे मांडली चूल कधी  !


तुझी ही अशी मान हले; मग तसा त्यावरी जीव झुले...
कधी मोरणी `होय` म्हणे तर `नको` सांगतो डूल कधी !


किती घासल्या रोज मनावर तुझ्या सारख्या आठवणी....
कुठे पेटला सांग तरी पण जिण्याचा पुन्हा गूल कधी ?


मनासारखी सोबत-संगत मिळे नेहमी काय कुणा ?
कधी लाभते फूल सुवासिक,  सले अंतरी शूल कधी !

गझल: 

स्थित्यंतरे

कापली नाहीत अजुनी तेवढी मी अंतरे
योजिली आहेत माझी मी निराळी अंबरे


मी भरारी घेतली अन दशदिशा भारावल्या
वेधले मी या नभाचे कोपरे अन कोपरे


पडझडीचा काळ माझा संपता कळले मला
सारखी येणार आता ही अशी स्थित्यंतरे


मी मनाच्या ताकदीने पंख हे फैलावले
अन क्षणातच मुक्त झाले हे युगांचे पिंजरे


जे जसे वाट्यास आले ते तसे स्वीकारले
शोधले नाही कधीही मी सुखाचे आसरे

गझल: 

दीनांच्या चाकरीसाठी : लोकशाहीर वामनदादा कर्डक


भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.


उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.


निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्‍यासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.


भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.


तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे.

कुठे नेतील या वाटा मनाला....

निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली

कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली

पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली

गझल: 

मला वाचवा: घनःश्याम धेंडे


"मला वाचवा, मला वाचवा" मरण बोलले
"बसू लागले चटके मजला" सरण बोलले


स्थलांतराचे दु:ख काय ते मला विचारा
"मी ही आहे ग्रस्त खरे तर" धरण बोलले


टिकून आहे उमेद माझी चालायाची
"थकून गेली वाटच पण ही" चरण बोलले


झुणका-भाकर, कांदा, ठेचा कुठवर खाऊ
"बासमतीचा भात कुणी द्या" वरण बोलले


तळे पाहुनी तृषार्त मी मग धावत सुटलो
"मृगजळ कुत्सित हसले होते" हरण बोलले


ह्रदय घेवुनी आईचे पळताना पडता...
"कुठे लागले बाळा?" अंतःकरण बोलले


घनःश्याम धेंडे
पुणे

मा.शंकर वैद्यांची गझल

काव्य संग्रहः दर्शन

मी खिन्न गीत गाता त्या कोण रोधिताहे?
आता मना कळे की आनंद येत आहे

मी व्यर्थ या विराण्या छेडीत,गात आलो
चित्तातल्या झर्‍याचा  उलटा स्वभाव आहे

या कातळामधूनी, गर्भातूनी मनाच्या
आनंद अमृताचा वर्षाव होत आहे

सृष्टीच मोर झाली, उत्फुल्ल हे पिसारे
डोळे मिटून घेणे हे पाप होत आहे

वारा फिरे सुखाचा अन् चांदणे दिगंती
'मी या जगात आहे', हे हेच सौख्य आहे


(जयन्ता५२)

 

Pages