सलील कुलकर्णीचे शब्दांवरचे लक्ष

सारेगामा च्या चाळिशीतील लोकांच्या पर्वात तसेच लहान मुलांच्या पर्वात सलील कुलकर्णी ने काही भटांचे काही शेर उध्दृत केले. यातून त्याचे वाचन दिसून आले. सध्याच्या पर्वातही हे दिसून आले की, शब्दांकडे त्याचे विशेष लक्ष असते. भटांच्या गझलांसंदर्भात ही बाब जाणवली.
नवीन पिढीतील असूनही गझलांकडे लक्ष असणे ही सलीलची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल.
नव्या पिढीत संगीतकारांमध्ये अजून कोणी असे आहे का?
जाणून घ्यायला आवडेल.

गझलचर्चा: 

प्रतिसाद

केदार,

निरीक्षण आवडले. अशी माहिती आणखीन देत रहावीत अशी विनंती!

मला असेही वाटले की काही वेळा पब्लिकली बोलताना 'गझलेवर विचार मांडणे' हे थोडेसे इंप्रेसिव्ह समजले जात असावे.

सारेगमपच्या कार्यक्रमात सलील कुलकर्णी काय बोलले ते अनेकांना माहीत नसावे. त्यांनी कुठल्या द्विपदी उद्धृत केल्या, त्यांचे निरीक्षण काय होते, हे थोडक्यात सांगावे ही विनंती. म्हणजे सगळ्यांनाच प्रतिक्रिया देता येतील.

चाळिशीतील पर्वात एका स्पर्धकाने भटांची गझल गायली.
सलीलने ती गझल संपल्यानंतर सांगितले,"तुम्ही गायलेल्या गझलेतील तो शेर हळवेपणाकडे झुकणारा होता. 'ओठी तुझ्या न आले, अद्याप नाव माझे..अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही' हा शेरदेखील भटांचा आहे. टोकाचा हळवेपणा आणि टोकाची बेफिकीरी हे दोन्ही भटांच्या गझलांमध्ये दिसते."
सलीलने तत्काळ संदर्भ दिल्याने त्याचे वाचन कळून येते.
सध्या सुरु असलेल्या पर्वात एका स्पर्धकाने 'रंगुनी रंगात सा-या..' ही रचना गायली. त्या स्त्री स्पर्धकाने 'सावल्यांच्याही झळा' यामधील 'ही' ऐवजी वेगळेच अक्षर उच्चारले. सलीलने गायन संपल्यावर दुरुस्ती केली.

टोकाचा हळवेपणा अन टोकाची बेफिकिरी भटांच्या गझलांमधे दिसते.

व्वा! चांगले व खरे निरिक्षण!

यावरून त्यांची एक ओळ आठवली.

'अरे हा आपला होता, अरे तो आपला होता'

साधीच ओळ, पण कुठल्याही वाचकाला / श्रोत्याला स्वतःची वाटु शकेल अशी व किंचित तरी गलबलवेल अशी!

माझे मत ::
झी मराठीच्या सारेगमप च्या मंचावर या गोष्टी होतच असतात.
पहिल्या पर्वात 'अर्थशुन्य भासे मज हा...' ही गीत कोणीतरी गाईले होते. त्यावेळी देवकी पंडीत यांनी शु र्‍ह्स्व हवा कारण कवीने तसा लिहिला आहे असे सांगितले होते. तसेच, चालीत 'अर्थशुन्य' बसण्यासाठी 'शु' चा उच्चार र्‍हस्व करून 'न' वाढवा असे सांगितले होते हे मला पक्के लक्षात आहे.
बहुतेक संगीतकार आणि गायक या सर्व गोष्टींचा विचार करीतच असतात. काही ठराविक लोकांनाच तशी संधी मिळाल्याने आपल्याला ते लक्षात राहते इतकेच.