रिताच पेला

पाऊस वादळाचा सारे कुटून गेला,
भा॑बावल्या जिवाला वारा लुटून गेला !.....१

हाती अखेर माझ्या आला रिताच पेला
खोटेच झि॑गताना तोही फुटून गेला !.......२

सोडून मोह सारे, केली तुझीच इच्छा
तेव्हाच नेमकासा तारा तुटून गेला !........३

त्या मैफिलीत, साधा ऐकून शेर माझा
शेजारचा कवी का रागे उठून गेला ?......४

कारागॄहात, आम्ही एकाच सर्व होतो
झेलून थू॑क 'त्या॑ची', जो तो सुटून गेला !..५

आजन्म ना कळाले, देहात जीव माझ्या
केव्हा कुठून आला ? केव्हा कुठून गेला ?..६

गझल: 

प्रतिसाद

गझल सदोष असू शकते, पण
"किर्पेच॑ दान द्याव॑ जी !!!"

चवथ्या व शेवटच्या शेरांत हा 'ठू' केव्हा कुठून आला अन गेलाच कसा नाही? :-))

मतला व दुसरा शेर आवडले. चवथा शेर कोणत्या मुशायर्‍यासंबंधात आहे हे सांगीतल्यास आम्हालाही पुढे काळजी घेता येईल. :-))

अभिनंदन!

बेफिकीरशी सहमत.
तंत्राचे सोडल्यास शेवटचा शेर छान.
चवथ्या शेराबद्दल...
साधा या शब्दामुळे मजा येत आहे. काहीवेळा साध्या गोष्टींमुळेच आवश्यक गोष्टी घडतात...:)

पाऊस वादळाचा सारे कुटून गेला,
भा॑बावल्या जिवाला वारा लुटून गेला !....

त्या मैफिलीत, साधा ऐकून शेर माझा
शेजारचा कवी का रागे उठून गेला ?......४

हे विशेष आवडले.

सुंदर गझल !
सगळे शेर आवडले.

शुभेच्छा !

४ थ्या अन ६ व्या शेरात ठ ची घेत्लेली सूट वगळता.....सुंदर गझल.

डॉ.कैलास

सोडून मोह सारे, केली तुझीच इच्छा
तेव्हाच नेमकासा तारा तुटून गेला !........

वा! खास शेर.
गझल आवडली.

खुप आवडली. पाऊस आवडले.

शेवटचा सर्वात आवडला... :-)

श्री. अभिषेक दीपक कासोदे,

सर्वप्रथम आपले अभिनंदन!

आपल्या गझलेला मिळालेले प्रतिसाद पाहून 'जर एखाद्याने प्रतिसाद या निकषावर हे संकेतस्थळ अभ्यासायचे ठरवले तर बाराखडी कशाला असा प्रश्न मनात येतो'!

विश्वस्त इतके 'बिझी' असतात का? मग नियम कशाला आहेत?

'रचनेचा आशय आवडला' हा प्रतिसाद तंत्रशुद्ध रचनांना मिळायला हवा हा आग्रह चुकीचा आहे का?

अभिषेक यांच्याबाबत वैयक्तीक टिपण नाही हे, पण त्यांच्या 'या' रचनेबाबत जरूर आहे.

-'बेफिकीर'!