तुझ्याच अंतरी विसावलो
Posted by अजय अनंत जोशी on Wednesday, 28 January 2009
विचारतेस का मला कुठून त्रासलो ?
तुझ्याच काळजातुनी हताश परतलो
उडायला नवीन पंख जोड भोवती..
असे म्हणू नयेस तू म्हणून थांबलो
सुखासवे अता कुठे जुळून यायचे..
तरी तुझ्यासवेच अंतरी सुखावलो
जशी मनात वेदना तहानली जरा..
तुझ्याच आसवातले हिशेब प्यायलो
'म्हणून मोकळीच हो ...उशीर का अता?'
तरी 'उशीर होवु दे' मनात बोललो
दुरावलो.. तरी तुला पहायला पुन्हा...
लगेच मी तुझ्याच अंतरी विसावलो
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
गुरु, 29/01/2009 - 15:38
Permalink
विधाने
अजय,
ही फक्त चर्चा आहे.
आपल्या या रचनेमधे माझ्यामते विधानात्मकता आहे. पद्यात्मकता कमी भासत आहे. उदाहरणार्थ मक्ता..
दुरावलो तरी तुला पहायला पुन्हा
लगेच मी तुझ्याच अंतरी विसावलो
तुझ्यापासून दुरावलो तरी तुझ्याच मनात विसावलो या विधानाला वृत्तात बसवल्यासारखे वाटत आहे.
माझ्यामते प्रत्येक शेरामधे डचमळून आणणारे काहीतरी आणण्याचा प्रयत्न केला जायला हवा.
आता याच पानावरील अभ्यंकरांची ही ओळ...
चेहरा सारे खरे ते सांगतो
याचसाठी आरसा मी टाळतो -
यामधे 'याचसाठी' हा शब्द महत्वाचा आहे. 'याचसाठी' मुळे शायराला सत्य सहन होत नाही हे वाचकाच्या लक्षात येऊ शकते. समजा 'याचसाठी' ऐवजी 'त्यामुळे हा' असा शब्दप्रयोग केला असता तर अर्थ तोच राहिला असता. म्हणजे शायर आरसा का टाळतो आहे हे लक्षात आलेच असते, पण 'याचसाठी' मधल्या 'च' मुळे भावनेची तीव्रता वाढली. 'च' मुळे त्यातला सपाटपणा किंवा विधानात्मकता जाऊन एक 'झटका' आला, जो माझ्यामते गझलेमधे अत्यावश्यक समजला जावा. आपल्या या गझलेतील काही शेर हे त्या अर्थाने स्मूथ वाटतात.
एक अंदाज -कदाचित आपण म्हणाल की जेव्हा शेर लक्षात येत नाहीत तेव्हा मी 'लक्षात न येणे' हे अयोग्य ठरवतो अन लक्षात आले तर 'सहज लक्षात येऊ शकणे' अयोग्य ठरवतो. पण कृपया तसे मानू नका. शेराचा अर्थ सरळ वाक्यासारखा असणे व त्यात 'अनपेक्षित' असे काही न जाणवणे यावर माझी वरची मते आहेत.
आपली मते ऐकायला आवडेल.
धन्यवाद!
अजय अनंत जोशी
गुरु, 29/01/2009 - 19:05
Permalink
नीट वाचा
भूषण,
आपण नीट वाचले नाहीत.
दुरावलो.. तरी तुला पहायला पुन्हा...
लगेच मी तुझ्याच अंतरी विसावलो
तुझ्यापासून दुरावलो तरी तुझ्याच मनात विसावलो या विधानाला वृत्तात बसवल्यासारखे वाटत आहे. हे आपले मत.
इथे - तुझ्यापासून दुरावलो तरी तुला पुन्हा पाहण्यासाठी 'लगेच' तुझ्या मनात विसावलो.
हे साधेच विधान आहे.
ज्याक्षणी मी तुझ्यापासून दुरावलो (देहाने-मनाने), त्याचक्षणी तुला पुन्हा पाहण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्याचक्षणी मी तुझ्या अंतरात विसावलो. (लगेच चे प्रयोजन)
विधानात्मक पद्य की पद्यात्मक विधान याचा विचार करणे शक्य नाही. अनेक विधानात्मक पद्यांना (कवितांना) भरभरून दाद मिळताना मी ऐकले आहे-पाहिले आहे. (आपण उदाहरण विचाराल तर मी देऊ शकत नाही. कारण माझ्याकडेही सध्या पुरेसा ऐवज आहे. आणखी कोणाचा नको आहे. )
माझ्यामते प्रत्येक शेरामधे डचमळून आणणारे काहीतरी आणण्याचा प्रयत्न केला जायला हवा.
हे जे विधान ही गझल वाचून तुम्ही केले आहेत ते प्रत्येक कवितेसाठी तुमच्या लक्षात असू द्या एवढेच सांगेन..
मी केलेली गझल श्रेष्ठ वगैरे नाही हे मलाही माहीत आहे.
कलोअ चूभूद्याघ्या
ज्ञानेश.
गुरु, 29/01/2009 - 20:53
Permalink
हंम्म....
हल्ली बर्याच प्रतिसादात चर्चा वाचायला मिळ्ताहेत...
असो.
मला हा शेर आवडला-
जशी मनात वेदना तहानली जरा..
तुझ्याच आसवातले हिशेब प्यायलो
काही शेर लक्षात आले नाहीत. (हा दोष माझ्याकडेच!)
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 30/01/2009 - 01:01
Permalink
व्वा
'म्हणून मोकळीच हो ...उशीर का अता?'
तरी 'उशीर होवु दे' मनात बोललो
अनंत ढवळे
शनि, 31/01/2009 - 12:04
Permalink
उशीर
'म्हणून मोकळीच हो ...उशीर का अता?'
तरी 'उशीर होवु दे' मनात बोललो
चांगला शेर !