माझा मुलगा

प्राणांपेक्षा मुलास माझ्या जपले होते
क्षण सोनेरी आनंदाचे टिपले होते

पुस्तक पुस्तक,पुस्तक पुस्तक,वाचन केवळ
वेडहि त्याचे काय मि सांगु कसले होते!!!

ज्ञानाचे भांडार म्हणू , की काय म्हणू मी
माहित होते! सगळे काही कळले होते.

नेतांना मग त्याला जेव्हा सरणावरती,
मृत्योचेही थोडे अश्रू ढळले होते

आत्ता आत्ता बोलत होता, चालत होता,
क्षणात एका प्रेतही त्याचे जळले होते.

दिसतो आता माझा मुलगा मित्रांसोबत
तो गेल्यावर सगळे जेव्हा जमले होते

कधी न दिसला दुःखी मजला माझा मुलगा
परिस्थितीवर म्हणून मीही हसले होते

--------------------स्नेहदर्शन

गझल: 

प्रतिसाद

प्राणांपेक्षा मुलास माझ्या जपले होते
क्षण सोनेरी आनंदाचे टिपले होते

मतल्यात पले होते हा काफिया ,रदीफ निश्चित झाल्यावर्,आपणास कसले,कळले,ढळले वापरता येणार नाही. मतल्यातच बदल करावा लागेल.

बरोबर आहे तुमचे,पण स्वर काफिया घेतला तर ..अले होते चालते.

खूप हळवी गझल्.....डोळ्यासमोर प्रसंग उभा करणारी.

वा वा ! क्या बात हे !!!!!!!!!!!! सुंदर

यार २६ वर्ष वय तुझे ,अजुन लग्न पण झाले नाही,आणि इतकी छान गझल.स्त्री च्या पुत्र विरहावर क्या बात हे!! खूप हळवी गझल आहे.

नेतांना मग त्याला जेव्हा सरणावरती,
मृत्योचेही थोडे अश्रू ढळले होते

हा शेर भिडला! 'मृत्यूचेही' असे हवे का? काफियाबाबत कैलासरावांशी सहमत आहे.

तसेच प्रेतही मध्येही 'हि' हवा आहे का?

ही गझल एखादी सत्यकथा आहे का? म्हणजे सत्यघटनेवर आधारीत आहे का?

धन्यवाद!

हो ही गझल सत्य कथेवर आहे,
'मृत्यूचेही' असे हवे का?
मग काय लिहावे?' मृत्यूचेपण....
.
मतल्यात पले होते हा काफिया ,रदीफ निश्चित झाल्यावर्,आपणास कसले,कळले,ढळले वापरता येणार नाही. मतल्यातच बदल करावा लागेल.

आणि अशी कारणे देणे म्हणजे आपण मराठी गझल फारच व्याकरणात बांधतो आहे ,तिला जरा आता खुलू द्या
आणि केलास जी ,आपण ताशेरे ओढण्याआधी जरा भाव बघा.मग व्याकरण.

मृत्यो = संबोधन = हाक मारणे

मृत्यूचेही हे योग्य ठरावे. मृत्योचेही असा शब्द बरोबर वाटला नाही इतकेच म्हणायचे होते.

गझलेचा भाव आवडलाच स्नेहदर्शन!

आपण म्हणता तसे ' स्वरकाफिया गृहीत धरणे ' हे गझलेबाबत असलेल्या बंधनांपैकी एक बंधन शिथिल करणे व त्यातून गझल खुलवणे असू शकते आहे हे मान्य! तशी टीप असती तर चर्चा बहुधा झाली नसती.

आपल्या पुढील गझलेच्याही प्रतीक्षेत!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मतल्यात पले होते हा काफिया ,रदीफ निश्चित झाल्यावर्,आपणास कसले,कळले,ढळले वापरता येणार नाही. मतल्यातच बदल करावा लागेल.

आणि अशी कारणे देणे म्हणजे आपण मराठी गझल फारच व्याकरणात बांधतो आहे ,तिला जरा आता खुलू द्या
आणि केलास जी ,आपण ताशेरे ओढण्याआधी जरा भाव बघा.मग व्याकरण>>>>>

मी गझलेवर ताशेरा ओढला नाही. आपण भटसाहेबांची बाराखडी प्रमाण मानून या संकेत स्थळावर गझल प्रकाशित करत असतो., कोणतीही सूट घेवून गझल लिहीण्यात काहीच गैर नाही. मी ती सूट दाखवून दिली,त्यास ताशेरा समजू नका.

गझलेतल्या आशयाने खरं तर अंतर्मुख व्हायला झाले....पण त्यावर चर्चा म्हणजे आपले दु:ख ताजे होण्यासारखे असल्याने त्यावर भाष्य केले नाही. असो.

अतिशय सुंदर रचना!
मनाला भिडणारी.
कैलासजी,भुषणजींचे म्हणणे पटले.
गझल अतिशय नाजूक साचा आहे.
त्यात सुटी घेतल्याने हळूहळू ती नाजुकता संपून जाईल !
तीची परिणामकारकता उरणार नाही.
यात एका रचनेचा किंवा एका गझलकाराचा प्रश्न नाही.
कॄपया वैयक्तिकपणे घेऊ नका.
ते दोघेही एका एका शब्दासाठी झगडतात,
स्वत:च्या गझलेतील त्रुटी उघड करतात.
रामकुमार

बेफिकीर [19 फेब्रुवारी 2011] नवीन
मृत्यो = संबोधन = हाक मारणे

मृत्यूचेही हे योग्य ठरावे
धन्यवाद मला पटले,
मी,गझल लिहीण्यात नविन आहे. आणि वयने पण २६,या संकेत स्थळावर शिकतो आहे सगळ्यांचेच अनुभव मला नविन शिकवण देतील.
कॄपया वैयक्तिकपणे घेऊ नका.

ह्र्दयस्पर्शी.
मी वाचलेल्या गझलांमध्ये प्रथमच ह्र्दय आणि डोळे एकत्र बोलले.
धन्यवाद.

गझल छान आहे..
मृत्यूचेही हेच योग्य आहे...

८४२ १११ ३३ ००,
९८ २२२ ६ ५५ ७७.
फोन कर किंवा तुझा नं. दे. माझ्या २६ वर्षाच्या मित्रा....

अमित....

एकदम मनाला भिडणारी, छान

काव्य म्हणून खूपच सुंदर आहे. वर काही जणांनी प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे खरोखरच एकदम भिडणारे.

परंतु ही गझल नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. मथळ्यातील जपले/टिपले व नंतरच्या द्विपदींमधे जमले, कळले,जळले असे झाले आहे ( स्वरयमक दीर्घ ऊ, ई व आ या स्वरांना चालते `अ' करता नाही त्यामुळे अशीही सूट अलाऊड नाही ) जरी अगदी अशी सूट घेतली तरीही काही द्विपदींचा स्वतंत्रपणे आस्वाद घेता येत नाहीये.

गझल लिहायची तर नियम पाळायला हवेतच असे माझे मत आहे.

पुन्हा एकदा सांगतो की या रचनेला कमी लेखायचा बिलकुल उद्देश नाही. ही गझल नाही हे मान्य केले तर आपण लिहिले आहे ते खूपच सुरेख काव्य आहे