कमळ नव्हे पण गुलाब तू तर - सुनेत्रा सुभाष

कमळ नव्हे पण गुलाब तू तर
बेगम कसली? नवाब तू तर

 

डोळ्यामध्ये विरघळतो मी
नाजुक माझी बाब तू तर

 

क्षीर पिणार्‍या हंसाला का
बदके म्हणती खराब तू तर?

 

ह्रदयी माझ्या हळूच शिरते
मम श्वासांचा रूबाब तू तर

 

मूग गिळोनी बसले सारे
विचार 'सुनेत्रा' जाब तू तर

 

गझल: 

प्रतिसाद

सन्माननीय सुनेत्रा,
वेगळे वृत्त अन वेगळी रदीफ घेतल्याबद्दल अभिनंदन! 'रुबाब' हा शेर आवडला.
पण माझ्यामते खालील ओळी बदलल्यास जास्त चांगल्या व्हाव्यात!
नाजुक माझी बाब तू तर - १५ मात्रा होत आहेत.
डोळ्यांवाटे मनात भिनते
जालिम असली शराब तू तर
( हा आपला माझा एक प्रयत्न, राग मानू नये, हा इस्लाह वगैरे नाही )
विचार 'सुनेत्रा' जाब तू तर
या शेरात 'तू तर' म्हणजे 'तू तरी ' असे म्हणायचे असल्यास 'तू तर' योग्य वाटत नाही.
मूग गिळे जग जिथे 'सुनेत्रा'
जवाब ना लाजवाब तू तर
हाही एक आपला माझा प्रयत्न. पण हा शेर ( म्हणजे मी रचलेला ) काही फार अर्थवाही नाही. तसेच 'जवाब ना' म्हणजेच 'लाजवाब' असल्यामुळे 'जवाब ना' ऐवजी काहीतरी आणखीन म्हणता येईल. तसेच या शेरामुळे आपल्या मूळ शेराचा आशय बदलतो. आपल्याच आशयाचा शेर रचायचा झाल्यासः
खोटे जग हे मूग गिळे जर
माग 'सुनेत्रा' जवाब तू तर
धन्यवाद!


 

मा. सुनेत्रा,

नाजूक बाब संदर्भात-
माझी स्वर्गीय बाब तू तर
माझी अलवार बाब तू तर

हे बदल कसे वाटतात, कृपया पाहावे. 

आणखी ब-याच शक्यता आहेत.
बाब च्या आधी केवळ एक लघु मात्रा आवश्यक आहे.

या शेरात 'तू तर' म्हणजे 'तू तरी ' असे म्हणायचे असल्यास 'तू तर' योग्य वाटत नाही.
पटण्यासारखे.
कटककरांनी जे शेरांचे पर्याय सुचविले आहेत, त्यांचा विचार करायला हरकत नाही.

रुबाब छान. मात्रा पहा.
बाकी ठीक.
कलोअ चूभूद्याघ्या

मा. भूषण,
आपण दिलेल्या सर्व सूचना योग्यच आहेत. मला त्यांचा राग वगैरे येण्याचे काही कारणच नाही. आपण सर्वजण या साईट वर गझला टाकतो ते सर्वांचे मार्गदर्शन मिळावे म्हणूनच.
'नाजुक बाब' या शेरात १५ मात्रा होतात हे खरेच, म्हणून 'नाजुक आमुची बाब तू तर' असे घेतल्यास कसे होईल?
जवाब, लाजवाब, शराब असे शब्द मराठी गझलेत वापरावेत का?
शिवाय या शब्दांमुळे इथे आशय बदलणार हेही  खरेच.
आपण सुचवलेला शेर
"खोटे जग हे मूग गिळे जर
माग 'सुनेत्रा' जवाब तू तर"                           
आवडला. पण त्याऐवजी
"मूग गिळोनी बसले सारे
मागच 'सुनेत्रा' जाब तू तर" असे घेतले तर?
'च' हे अक्षर माझ्या दृष्टीने इथे भरीचे नाही.
'मागच' यातून 'तुला आता जाब मागायलाच हवा' असे प्रतीत होते.
 
मा. केदार,
आपण दिलेल्या सर्व सूचना खूप काही शिकवून गेल्या. खरे तर यामुळेच गझलेवर पुन्हा थोडासा विचार करावा वाटला.
अलवार बाब व नाजुक बाब हे शब्द आशयाच्या दृष्टीने फार वेगळे ठरतात. म्हणून तेथे अलवार बाब घेणे बरोबर वाटले नाही. आपण म्हटल्याप्रमाणे शेवटच्या शेरात 'तू तरी' असे म्हणायचे असल्यास 'तू तर' हा रदीफ योग्य वाटतच नाही हे ही खरेच. म्हणून
"मूग गिळोनी बसले सारे
पुसणारी तया जाब तू तर"
 
मा. अनंत,
आपण कमी शब्दात दिलेली सूचना योग्यच आहे. मात्रा तर बघायलाच हव्यात.
 
 
आपणा सर्वांना धन्यावाद!
सुनेत्रा सुभाष

वेगळी रदीफ. वेगळा सुंदर प्रयत्न. बाकी भुषण यांनी सांगितले आहेच.