हा माझा पंथ नाही




कोण जाणे मी कुणाला का कधी पसंत नाही?
नापसंतीची त्यांच्या मजला कधी खंत नाही ||१||


बोलतो मी अर्वाच्य नुसते सारेच हे म्हणती असे
अभंग बोलण्यास मग मीही टाळकुट्या संत नाही  ||२||


बोलणे माझेच का काट्यापरी  खुपे त्यांना?
फुलापरी बोलायाला बहराचा मी वसंत नाही ||३||


थांबता का मजसाठी? कितीदा पुसावे त्यांना
थांबण्यासाठी इथे पण कुणालाच उसंत नाही ||४||


चालणे मलाच आता कठीण वाटू लागले
आपोआप चालण्या मी ज्ञानियाची भिंत नाही ||५||


जिंकीवी ह्रदये सारी गोड लटके बोलुनी
गोडीत गळा कापण्याचा हा माझा पंथ नाही ||६||


कवी:- श्रीराम समर्थ
निमित्त:- महेश अवसरे




Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

नमस्कार,

कल्पना चांगल्या आहेत. मतल्यात दोन्ही ओळींत यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (असल्यास) हवेच. या रचनेत मतला दिसत नाही.  तसेच संपूर्ण गझल एकाच वृत्तात असायला हवी. ह्या रचनेबाबत असे म्हणता येणार नाही. त्यामुळे ही रचना काही काळाने विचाराधीन ह्या विभागात हलविण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
पुन्हापुन्हा
बाराखडी वाचावी. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्तात गझल लिहिली जाते.
वृत्तांचा अभ्यास करावा. लघू आणि गुरू म्हणजे काय, ह्याचा अभ्यास करावा.
अक्षरगण कसे पडतात किंवा मात्रा कशा मोजतात, हे देखील समजून घ्यावे. किमान
एवढ्या गोष्टी गझल लिहू इच्छिणार्‍याला शिकणे आवश्यक आहे. पहिल्या दोन ओळी
(मतला) निर्दोष होत नाहीत तोपर्यंत नवोदितांनी पुढे जाऊ नये.

समर्थ रामदासांनी भुजंगप्रयातात मनाचे श्लोक लिहिले आहेत. ह्या भुजंगप्रयात गझल लिहून बघा. 

धन्यवाद!!! मी जरुर अभ्यास करीन.