पत्र-भाग १

प्रिय सुरेश भट यांस सस्नेह नमस्कार.


'रंग माझा वेगळा' हा तुमचा कवितासंग्रह तुम्ही अगत्यपूर्वक मला वाचण्यासाठी दिला त्याबद्दल आभारी आहे. तुमच्या कविता वाचायला सुरवात केली आणि एका बैठकीतच सगळा संग्रह मी वाचून काढला. तुमच्या कविता वाचताना सहज जे विचार मनात आले ते तुम्हाला लिहून कळवावे असे वाटले; म्हणून हे पत्र लिहीत आहे.


तुमच्या कवितांमागे वेगवेगळ्या प्रेरणा आहेत. काही कविता देशात घडणाऱ्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाच्या प्रसंगी लिहिल्या गेल्या आहेत. या कवितांमधून तुमच्या देशभक्तीचा, मायदेशाविषयीच्या, तुमच्या उत्कट भावनेचा आविष्कार झाला आहे. या कवितांतली 'उषःकाल होता होता काळरात्र झाली! अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!' ही कविता मला अतिशय आवडली. देश स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्याबरोबर आपली जी सुखस्वप्ने साकार व्हायला हवी होती ती तशी झाली नाहीत. उलट स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशात अनेक दुष्ट प्रवृती मोकाट सुटल्या आणि सामान्य माणूस साध्या सुखाला, साध्या आनंदालाही वंचित झाला. यामुळे संवेदनक्षम कविमनात उसळलेला प्रक्षोभ या कवितेत अतिशय परिणामकारक रीतीने प्रकट झाला आहे. इथे तुमची चीड, तुमचे दुःख, तुमची वेदना अगदी अस्सलपणे जाणवते आणि ती काळजाला जाऊन भिडते. या सुंदर कवितेबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच.


तुमच्या कवितासंग्रहातला दुसरा भाग आहे तो गीतांचा. मी कविता आवडीने वाचते. गीतांशी तर गाण्यामुळे हरघडी संबंध येतो. गीते वाचताना मला ती त्यातल्या काव्यकल्पनांमुळे जशी आकर्षून घेतात तसे त्यात दडलेले 'गाणे'ही मला सारखे जाणवत राहते.'वाजवी मुरली देवकिनंदन', 'आज गोकुळात रंग खेळतो हरी', सखि मी मज हरपुन बसले ग',मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' ही तुमची गीते वाचताना मला त्यातले काव्य तर आवडलेच; पण त्याची 'गेयता' ही मला हृदयंगम वाटली. काव्य आणि गीत यांना जोडणारा धागा गेयता हाच आहे. गीताची शब्दरचना निर्दोष असली, नादमधुर मृदू व्यंजनांनी युक्त असली, तर असे गीत चाल बसवण्याच्या दृष्टीने संगीतदिग्दर्शकाला प्रेरणा देते आणि गायकालाही ते गीत गाताना मनाला थोडे समाधान वाटते. 'आज गोकुळात रंग खेळतो हरी', 'मेंदीच्या पानवर', मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' ही तुमची गीते ध्वनीमुद्रिकेसाठी गाताना मला हे समाधान आणि आनंद फार मोठ्या प्रमाणात लाभला. चांगल्या गीताची माझ्या दृष्टीने एक कसोटी आहे. गीत इतके चांगले 'बांधलेले' असावे की ते 'बांधले' आहे हेही कुणाच्या ध्यानात येऊ नये. तुमची गीते रचनेच्या दृष्टीने इतकी देखणी व बांधेसूद आहेत की, ती ह्या कसोटीला निश्चित उतरतात. गीत कोणते आणि काव्य कोणते; गीतकाराला कवी मानावे की नाही, या वादात माझ्यासारखीने पडू नये. पण उत्तम गीत हे मुळात उत्तम काव्यही असावे लागते, ह्याबद्दल सहसा कुणाचा मतभेद होईल असे वाटत नाही. तसेच पाहिले तर ज्ञानदेवांसारख्या महाकवीची 'मोगरा फुलला', 'पैल तो गे काऊ कोकताहे','धनु वाजे घुणघुणा' किंवा 'रुप पाहता लोचनी' ही गीतेच आहेत ना? पण त्यातले काव्य अस्सल नाही असे कोण म्हणेल? 'मालवून टाक दीप' हे तुमचे गीत उत्तम काव्य म्हणूनही तितकेच परिणामकारक आहे. 'बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग' यासारखी त्या गीतातली रम्य आणि नाजूक कल्पना गीत गाऊन झाल्यावरही दीर्घकाळ माझ्या मनात तरळत राहिली.


तुमच्या या संग्रहातला सर्वात चांगला वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे तो अर्थात गझल शैलीतील कवितांचा. तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमच्या व्यथा, तुमच्या वेदना, जीवन जगताना तुम्हाला आलेले कटु अनुभव, या साऱ्यांचा अर्क तुमच्या गझलवजा कवितांत उतरला आहे. उर्दू कवींच्या गझला तुम्ही मनःपूर्वक वाचल्या आहेत. इतकेच नव्हे तर गझलांची जी एक 'खासियत' असते ती तुम्ही स्वतःमध्ये उत्तम मुरवली आहे. एक प्रकारची बेहोषी, बेफिकिरी, जगाबद्दलची पूर्ण उपेक्षा, आपल्याच भावविश्वात रमून राहण्याची वृत्ती, तीव्र एकाकीपणा, आणि अंतःकरणात सलत राहिलेल्या दुःखाची जिवापाड जपणूक-

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो!
चिरा चिरा जुळला माझा, आत दंग झालो!
किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो!
अन् असाच वणवणतांना मी मला मिळालो!

सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो
...          ...           ...
आता मजेने बोलतो भेटेल त्या दुःखासवे!
सांभाळूनी घेती मला माझी इमाने आसवे!
...          ...           ...
केव्हातरी दात्यापरी आयुष्य हाका मारते
मीही असा भिक्षेकरी ज्याला न काही मागवे!


तुमच्या कवितांमध्ल्या काही कल्पना विलक्षण नाजूक आणि सुंदर आहेत, अशा कल्पना माझ्या कायम ध्यानात राहून गेल्या आहेत!

मनांतल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो!
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो!
तसा न राहिला आता उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो
!
...          ...           ...
अशीच येथली दया हवेत चांचपायाची
अशीच जीवनास या पुन्हा क्षमा करयाची
...          ...           ...
असेच निर्मनुष्य मी जिथेतिथे असायचे
मनात सूर्य वेचुनी जनांत मावळायचे!
...          ...           ...
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल!